E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक ,संपादकीय
भाषा शिक्षणाचा विचार केवळ औपचारिकताच
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्या निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर राज्यातील सुमारे ४५ टक्के विद्यार्थी हे सत्तर टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध विषयांपैकी २३ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला. २११ विद्यार्थ्यांना पैकींच्या पैकी गुण मिळाले आहे. शंभर टक्के निकाल लागणार्या शाळांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढत आहे. हा वाढता आलेख म्हणजे खऱोखर गुणवत्ता आहे की, परीक्षा मंडळाच्या असलेल्या विविध सवलतीचा लाभ घेत सुजलेली आकडेवारी आहे. सध्या निकालाचा टक्का काहीसा घसरला आहे. अर्थात तो फार मोठा आहे असे नाही; मात्र राज्य मंडळाने कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्याने त्याचा काही सकारात्मक परिणाम दिसून आला.
ही गोष्ट अत्यंत चांगली आहे; मात्र दरवर्षी निकालाच्या सुजेवर पर्याय म्हणून परीक्षा मंडळाने उपाय शोधायला हवेत. एकीकडे दहावीला नव्वद टक्के गुण मिळवणार आणि दुसरीकडे बारावीला हेच विद्यार्थी पन्नास-पंच्चावन्न टक्के मिळवत आहेत. बारावीला माध्यम बदलते म्हणून विज्ञान शाखेत गुण कमी मिळाले असे म्हणता येईल; मात्र ते किती टक्के गुण कमी व्हावेत? याचाही विचार व्हायला हवा. अलिकडच्या निकालात मराठी विषयात विद्यार्थी नापास होत असतील, तर ते विद्यार्थी इतर विषयात कसे काय उत्तीर्ण होतात ? हाही प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षणाच्या प्रक्रियेत केवळ कॉपीमुक्त अभियानाने निकालात फरक पडत असेल, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला बळ देणार्या आणखी काही गोष्टी घडण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर प्रथम भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करून अभ्यास करणार्या सुमारे ६४ हजार विद्यार्थी आणि द्वितीय व तृतीय भाषा म्हणून ज्यांनी मराठी विषयाची निवड करून परीक्षा दिली आहे. त्यापैकी सुमारे १२ हजार विद्यार्थी चक्क मराठी विषयात नापास झाले आहेत. ज्या राज्याची राजभाषा मराठी आहे, ज्या भाषेला नुकताच केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे, अशा मराठी भाषेतच आपल्या राज्यातील सुमारे ७८ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. एकीकडे परकीय भाषेत विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत आणि स्वतःची मातृभाषा असलेल्या विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण होत आहेत याचा नेमका अर्थ काय ? संत ज्ञानेश्वरांनी माय मराठीचे बोलु कौतुके, अमृताते पैजा जिंके असे आपल्या मराठीचे वर्णन केले आहे. त्या मराठी कुटुंबातील पाल्यांनाच मराठी भाषेची जाण नसेल, विद्यार्थ्यांना स्वतःच्या भाषेचे किमान आकलन नसेल, आपल्या मातृभाषेत उत्तीर्ण होत नसतील, तर मराठी भाषेचा समृद्ध प्रवास कसा घडणार? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. केंद्र सरकारने आज ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्या समृद्ध असलेल्या भाषेचे उद्याचे नेमके भविष्य कसे असेल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने दहावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे पसंत केले. या विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे शेकडा प्रमाणे ९४.१० टक्के इतके आहे. राज्याच्या निकालाची परंपरा कायम राहिली आहे. अर्थात या वर्षी काहीसा निकालाचा आलेख घसरला आहे; मात्र तरी तो फार मोठ्या प्रमाणावर घसरला आहे असे चित्र नाही. राज्यातील पंधरा लाख ५८ हजार विद्यार्थ्यांपैकी १० लाख ८५ हजार १७६ विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करत परीक्षा दिली होती. त्यापैकी १० लाख २१ हजार ५१८ विद्यार्थी मराठी विषयात उत्तीर्ण झाले आहेत. हे उत्तीर्णतेचे प्रमाण शेकडा ९४.१३ टक्के इतके आहे. याचा अर्थ प्रथम भाषा म्हणून मराठी विषयाची निवड केलेले विद्यार्थी हे आपल्याच राज्याचे रहिवासी आहेत. मराठी हीच ज्यांच्या कुटुंबाची, परिसराची भाषा आहे. असे सुमारे ६४ हजार विद्यार्थी मराठी विषयातच अनुत्तीर्ण झाले आहेत. हे विद्यार्थी मातृभाषेत नापास झाले असले, तरी काही प्रमाणात हेच विद्यार्थी मात्र इतर भाषांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत हे विशेष.
मराठीचा निकाल
मराठी माध्यमांव्यतिरिक्त इतर भाषा माध्यमात शिकणार्या आणि द्वितीय व तृतीय भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करत शिकणार्या विद्यार्थ्यांचा विचार केला, तर ४ लाख १६ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची परीक्षा दिली, त्यापैकी ४ लाख ४ हजार ६१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या माध्यमांचा मराठी विषयाचा निकाल ९७.१८ टक्के लागला आहे. येथे सुमारे १२ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्याचबरोबर मराठी-हिंदी, मराठी-संस्कृत, मराठी-अरेबिक, मराठी -पर्शियन, मराठी-सिंधी, मराठी-बंगाली अशी संयुक्त विषय घेऊन परीक्षा देणारे ८४ हजार २३७ विद्यार्थी आहेत, त्यापैकी ८१ हजार २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा निकाल ९६.१८ टक्के निकाल लागला. याचा अर्थ इतर भाषिक माध्यमात शिकत असलेल्या आणि मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मराठी विषयाचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. राज्यात इंग्रजी भाषेचा विचार करता प्रथम भाषा इंग्रजी याचा अर्थ ही सर्व मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकत आहेत. या माध्यमातील ३ लाख ६८ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ३ लाख ६८ हजार १२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ३ लाख ६३ हजार २२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे शेकडा प्रमाण ९८.६७ इतके आहे. आता इंग्रजी भाषा ही प्रथम भाषा म्हणून निवडलेले विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमात शिकत असले तरी ते येथील मराठी मातीतील विद्यार्थी आहेत, यातील काही विद्यार्थ्यांची मातृभाषा ही मराठी व्यतिरिक्त असण्याची शक्यता आहे. अर्थात हे प्रमाण फारच कमी असणार. आता हे विद्यार्थी मराठी भाषक असूनही इंग्रजी माध्यमात शिकत आहेत आणि इंग्रजी विषय उत्तीर्ण होत आहेत; मात्र मराठी हीच मातृभाषा असलेले विद्यार्थी हे मराठी विषयात अनुतीर्ण होत आहेत. मराठी अथवा इतर माध्यमात शिकणार्या आणि इंग्रजी हा विषय तृतीय भाषा म्हणून परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या एकूण १२ लाख २८ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज सादर केले.
मराठी प्रथम भाषेचा निकाल ९४.१३ टक्के व इंग्रजी ही प्रथम भाषा असलेल्या विद्यार्थ्यांचा माध्यम भाषेचा निकाल ९८.६७ टक्के आहे. इंग्रजी भाषा तृतीय म्हणून स्वीकारलेल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२७ टक्के इतके आहे. म्हणजे एका अर्थाने मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी भाषेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाणे अधिक आहे. राज्यात सिंधी, बंगाली प्रथम भाषा आणि तामिळी, मल्याळम, पाली, अरेबिक या भाषांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अर्थात या विषयाला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत अल्प आहे. संपूर्ण राज्यात ही संख्या पाचशेच्या आत आहे, तर मल्याळमसारख्या भाषेला तर अवघा एक विद्यार्थी प्रविष्ठ झाला होता. अशा परिस्थितीत आपल्या राज्यात मराठी विषयाच्या अध्यापन प्रक्रियेचा विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थी मराठी भाषा अनुत्तीर्ण होत आहेत, याचा अर्थ भाषिक कौशल्य या विद्यार्थ्यांना प्राप्त असण्याची शक्यता नाही. भाषेचे कौशल्य नाही म्हणजे या विद्यार्थ्यांचे शिकणे होण्याची शक्यता अजिबात नाही. असे असताना हे विद्यार्थी दहावीपर्यंत पोहोचले हेही विशेष म्हणायला हवे.
राज्यात मराठी प्रथम भाषा असलेले विद्यार्थी आणि इंग्रजी प्रथम भाषा असलेले विद्यार्थी यांचा तुलनात्मक विचार केला, तर मराठी प्रथम भाषा असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १० लाख ९४ हजार ९३५ इतकी आहे, तर इंग्रजी माध्यमात शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ६८ हजार ८१२ इतकी आहे. राज्यात साधारण इंग्रजी भाषा माध्यमात ३३.६८ टक्के विद्यार्थी शिकत आहेत. ज्या राज्याची मराठी ही राजभाषा आहे, त्याच राज्यात इंग्रजी माध्यमात शिकणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सातत्याने वाढताना आकडेवारीवरून दिसत आहे. याचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे. आपल्याच मराठी मातृभाषा असलेल्या राज्यात मराठीची अवस्था काहीशी कठीण आहे का? याचा विचार करावा लागणार आहे. एकीकडे मराठी माध्यमांच्या शाळांची पट संख्या कमी होत चालली आहे. मराठी शाळा महानगरामध्ये बंद पडत आहेत. वर्तमानात जी मुले मराठी माध्यमात शिकत आहेत, ते विद्यार्थी मराठी भाषेतच नापास होत आहेत. त्यामुळे मराठी विषयाचे अध्यापन करणार्या शिक्षकांनी अध्यापन प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. मुळात ज्या माध्यमात विद्यार्थी शिकत आहेत, त्या मराठी भाषेचे आकलन विद्यार्थ्यांना होत नसेल, तर ते विद्यार्थ्यांचे इतर विषयाचे शिकणे खरेच प्रभावी आणि परिणामकारक कसे होणार? हा प्रश्न आहे. शेवटी भाषा हेच शिक्षणाचे माध्यम असते. ज्या विद्यार्थ्यांची शिकण्याचे माध्यम असलेली भाषा उत्तम असते, त्या विद्यार्थ्यांचे शिकणे परिणामकारक होते, हे शिक्षणशास्त्र आणि भाषातज्ज्ञ सांगत आले आहेत. आज भाषेच्या शिक्षणाच्या संदर्भाने विचार करण्याची गरज आहे.
वर्तमानातील वास्तव
आज दहावीपर्यंत मराठी भाषेची कायद्याने सक्ती केली आहे. त्यामुळे सक्तीने का होईना विद्यार्थी मराठी भाषा शिकत आहेत; मात्र ही भाषा शिकणे खरंच विषय म्हणून आहे की, भाषा म्हणून आहे? याचाही विचार करण्याची गरज आहे. आज शालेय स्तरावर तीन भाषा शिकवल्या जात आहेत. त्या भाषा विषय म्हणून शिकवल्या जात असल्या, तरी भाषा म्हणून कौशल्य, भाषिक रसास्वाद, सौंदर्य, साहित्य यांसारख्या विविध कौशल्यांचा प्रवास घडताना दिसत नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखड्यात भाषेच्या संदर्भाने विशेष अपेक्षा करण्यात आल्या आहेत. मुळातच या अपेक्षा वर्तमानातील वास्तव आपण समजून घेतले, तर खरच साध्य होणे शक्य आहे का? वर्तमानात भाषा समृद्धतपणे, तिच्या साहित्याचा फारसा आस्वाद घेण्याची वृत्ती न रूजवते, केवळ विषय म्हणून शिकवला जात आहे. भाषेची कौशल्ये साध्य होण्याची अपेक्षा असताना त्या दिशेने प्रवास न करता केवळ माहिती संपन्नतेचा प्रवास करूनही विद्यार्थी नापास होत आहेत, तेथे खरोखर भाषा अध्यापनाची प्रक्रिया ही भाषा म्हणून करण्यासाठी पावले उचलली गेली आणि त्यादृष्टीने मूल्यमापनाचा विचार केला गेला तर भाषेचा निकाल किती लागेल? याचा अंदाज न केलेला बरा. मुळात आपल्याकडे भाषेचा विचार हा विषय म्हणूनच अधिक विचार केला जातो. भाषा म्हणून अध्यापनाचा कल हरवत चालला आहे. भाषा शिक्षणाचा विचार केवळ औपचारिक शिक्षणापुरता उरला आहे. त्यामुळे भाषिक विकासाचा विचार करता हे विद्यार्थी भविष्यात भाषा शिक्षणाकडे खरचं आकर्षित होतील का? अन्यथा भविष्यात भाषा विषय शिकवला गेला तरी इतिहासातील योगदानावर भाषा अभिजात ठरली आहे आणि वर्तमानातील भाषा प्रवासाने तिचा प्रवास विकलांग होण्याचा धोका आहे. त्यामुळे पाऊण लाख विद्यार्थी मराठीत नापास होत आहेत, याकडे अधिक गांभीर्यांने पाहण्याची गरज आहे. आज मराठी भाषेची अशी स्थिती असेल, तर यासंदर्भाने मराठी विषयाचे अध्यापन करणार्या सर्वांनीच अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. एकीकडे गेले काही वर्ष इंग्रजी माध्यमात विद्यार्थी संख्या उंचावते आहे. दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळांना कुलूप लागते आहे. विद्यार्थी संख्या घटते आहे. अशावेळी मराठी विषयाच्या निकालाची टक्केवारी देखील घटते आहे. या सर्व परिस्थितीचे अधिक गांभीर्याने चिंतन करण्याची गरज आहे.
Related
Articles
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
शिंगणापूर देवस्थानाने १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले
14 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
शिंगणापूर देवस्थानाने १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले
14 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
शिंगणापूर देवस्थानाने १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले
14 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
शिंगणापूर देवस्थानाने १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले
14 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक